सार्वजनिक गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य आहे. लोकमान्य टिळकांनी लोकांना संघटित करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने स्वातंत्र्यपूर्व काळात समाजप्रबोधनाचे मोलाचे कार्य केले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्य हे आता केवळ उत्सवापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. वर्षभर चालणाऱ्या सामाजिक कार्याचे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. विविध गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या संस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहेच. शिवाय नवोदित कलाकारांना एक उत्तम व्यासपीठही मिळवून दिले आहे.
जुलै १९२९ साली श्री. के. बी. कदम, दातार व त्यावेळचे चाळ अधिक्षक श्री. वैद्य तसेच अन्य कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने वस्तीतील रहिवाशांची सभा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यांच्या पुण्यस्पर्शाने व आशिर्वादाने श्री गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून अव्याहतपणे मंडळातर्फे श्री गणेशोत्सव साजरा होत आहे.